विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सूर्योदय अर्बनचा स्थलांतर सोहळा दिमाखात संपन्न
सांगोला/प्रतिनिधी -
राज्यामध्ये विविध क्षेत्राप्रमाणेच बँकिंगमध्ये देखील प्रचंड स्पर्धा आहे. कित्येक आर्थिक संस्था व्यवसाय करत असताना प्रचंड अडचणींशी सामना करताना आपल्याला दिसून येतात. नोकरी असेल, एखादा व्यवसाय असेल किंवा शेतामध्ये काबाडकष्ट करून मिळवलेल्या उत्पन्नातील काही भाग एखाद्या संस्थेमध्ये ठेव म्हणून ठेवत असताना त्या संस्थेचा चहू अंगांनी विचार केला जातो. ज्या एखाद्या संस्थेबरोबर आपण व्यवहार करतो. त्या संस्थेचे संचालक मंडळ मालकशाही न दाखवता एक विश्वस्त म्हणून निरपेक्ष भावनेने काम करत असतील तरच अशा संस्था नावारूपास येतात. अशाच आदर्श विश्वस्तांच्या नामावलीत अग्रस्थानी असलेले सूर्योदय अर्बनचे संस्थापक असलेल्या अनिलभाऊ इंगवले यांनी तळमळ, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या बळावर ग्राहकांचा आणि ठेविदारांचा संपादन केलेला प्रचंड विश्वासच सूर्योदय अर्बन या संस्थेला आणखी समृद्ध करणार असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगोला या संस्थेच्या स्थलांतर सोहळ्यानिमित्त उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माणदेशामध्ये प्रसिद्ध असलेली ’सोन्याचं सांगुलं’ ही म्हण इथली सोन्यासारखी माणसे पाहिल्यानंतर खरोखर पटते. शहाजीबापू, डॉ बाबासाहेब, दीपकआबा तसेच चेतनसिंह ही मंडळी विकास कामाकरिता राजकारण बाजूला ठेवून सातत्याने एकत्र येताना इथं पाहायला मिळतात. विकासाभिमुख राजकारणाची पाठशाळा म्हणजे सांगोला तालुका आहे. अशा संस्काराचा वारसा असलेल्या या सांगोल्यामध्ये अनिलभाऊ इंगवले यांनी त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन आर्थिक संस्थांबरोबरच विविध उद्योगांमध्ये घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. असेही त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले. यावेळी विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले की, अनिलभाऊ इंगवले हे सहकाराचे उत्तम जाण असलेले व्यक्तिमत्व असून माझ्या तालुक्यातील ही माणसं महाराष्ट्राच्या पलीकडे देखील काम करताना पाहून तालुक्याचा आमदार म्हणून मला खूप अभिमानाने सूर्योदयच्या उद्योगांचे कौतुक करावेसे वाटते. त्याचबरोबर राजकारण विरहित विचारशैली घेऊन उद्योग विश्वामध्ये भरारी घेत असताना सामाजिक भान देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर कसे जपावे याचाही आदर्श सूर्योदयने सर्वांसमोर घालून दिलेला आहे. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनीही यावेळी बोलताना सांगितले की, अनिलभाऊ इंगवलें यांनी डॉ बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी आणि सुभाष दिघे गुरुजी यांना सोबत घेऊन सर्वदूर उभ्या केलेल्या संस्था विविध कामानिमित्त राज्यात फिरत असताना ठिकठिकाणी दिसतात. हे सारे माझ्या तालुक्यातील तरुण युवक असून पतसंस्था किंवा मल्टीस्टेट सारख्या आर्थिक संस्था तसेच पशुधनाला समृद्धी यावी म्हणून अनेक भागात सुरू केलेले दुधाचे चीलिंग प्लांट आणि सूर्योदय मॉल, वस्त्रनिकेतन सारख्या उद्योगांच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हातांना यांनी काम उपलब्ध करून दिलेले आहे. महाराष्ट्रभर फिरत असताना अनिलभाऊ इंगवले यांच्या नेतृत्वाखाली सूर्योदय ग्रुपने उभ्या केलेल्या संस्था पाहून या तरुणांच्या कर्तुत्वाची साक्ष पटते. असे सांगत सूर्योदय ग्रुपच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये सूर्योदय अर्बन या संस्थेची सखोल माहिती त्यांनी सांगितली. सूर्योदय ग्रुप मधील विविध आर्थिक संस्थांच्या माध्यमातून सन्माननीय सभासदांच्या आणि आमच्या असंख्य ग्राहकांच्या अतूट विश्वासावर तब्बल साडेपाचशे कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच आर्थिक संस्थांच्या आणि सूर्योदय उद्योग समूहातील इतर सर्वच उद्योगांच्या प्रगतीचा आलेख मांडत सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंचावर माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सागरदादा पाटील, पंचायत समितीच्या सभापती पुनमताई इंगवले, उपसभापती अजय सरगर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, फॅबटेक ग्रुपचे भाऊसाहेब रुपनर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, उपनगराध्यक्ष नितीन इंगोले, तहसीलदार भागवत मॅडम, जि प सदस्य अतुल पवार, दादासाहेब लवटे, शोभाताई खटकाळे, किरणभाऊ पांढरे, मोहन आलदर, माजी जि प सदस्य एड. सचिन देशमुख, नगर परिषदेच्या सभापती वैशाली सावंत, गोदाबाई बनसोडे, छायाताई मेटकरी, आशादेवी यावलकर, नगरसेवक इंजि रमेश जाधव, जुबेर मुजावर, अरुण पाटील, मारुतीआबा बनकर, संभाजीतात्या आलदर, संस्थेचे आर्किटेक्चर प्रसाद कुलकर्णी, संस्था इमारत जागेचे मालक अमर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे उत्कृष्ट सुशोभीकरण, हलग्यांचा कडकडाट व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये केलेले मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रम सुरू व्हायला उशीर होऊन देखील उपस्थित असलेली प्रचंड गर्दी विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती. यामुळे हा स्थलांतर सोहळा संस्मरणीय झाला असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या व सूर्योदय समूहातील कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.
